Latest News

वजन कमी करायचे आहे ??



१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले     तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.
२. अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.
३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे.  पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाड, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.
४. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.
५.वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल.
६. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते.
७.  वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते.
८. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त असते.भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम.
 
ताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची.
कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल. 
महात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. 
 

बिनातेलाची फोडणी :
तेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्‍न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. 
तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्‍या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही. 
तेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्‍चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. 
 यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा.
मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्‍न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही.
अशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल.

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.